लखनऊ : महाराष्ट्रात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांकडून यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राबरोबरच आता इतर राज्यातील स्थानिक निवडणुकांकडे देखील पक्ष लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आता उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपुर्वीच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेने आपले उमेदवार उतरवले होते. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला फारसे यश मिळाले आहे. आता शिवसेना उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांमध्ये उमेदवार उतरवणार आहे.
शिवसेनेआधी आम आदमी पार्टी आणि एमआयएमने देखील यूपीतील स्थानिक निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील राज्य प्रमुख असणाऱ्या अनिल सिंह यांनी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन पक्ष प्रभारींची नेमणूक केली जात असल्याची माहिती दिली आहे.
निवडणूक व्यवस्थापनाची माहिती जाणून घेण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात येणार आहे. हे लोक सुमारे एक आठवडा मुक्काम करतील. शिवसेना बीएमसी व ग्रामीण भागात कशी कार्यरत आहे, हे शिकवण्यात येणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत शिवसेना काँग्रेससोबत युती करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.