मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर भाजप-महाविकास आघाडीत नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कथित पीएमसी घोटाळ्यासंदर्भात ईडीने नोटीस बजावल्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले.
वर्षा राऊत यांना नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधत आपल्या भाजपाच्या 120 लोकांची यादी असल्याचा दावा केला होता. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उडी घेत, ही यादी ईडीला सोपवावी, असे आवाहन राऊतांना केले आहे.
संजय राऊत यांच्याकडे भाजप नेत्यांची यादी असल्यास त्यांनी त्वरीत ती ईडीकडे द्यावी, असे थेट आवाहनच आठवलेंनी केले आहे. तसेच, भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम नाही, असेही यावेळी आठवले म्हणाले.