मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालायने रद्द केल्यानंतर, मराठा समाजाच्या वाढत्या रोषाला शांत करण्यासाठी, ठाकरे सरकारने राज्यपालांकडे जाऊन, या मुद्द्यावरून राष्ट्रपतींना लिहिलेले पत्र सुपूर्त केले. तसेच, यांनतर विशेष न्यायाधीशांची एक समिती नेमून, त्यांना या कायद्यातील त्रुटी शोधण्याचे काम दिले. मात्र यानंतरही पुढे काही ठोस असे निर्णय आणि पाऊल आघाडी सरकारकडून उचलले जात नसल्याने, नाराज आणि संतप्त मराठा समाजाने आता पुन्हा मोर्चे आणि आंदोलने करण्याचा निश्चय केला आहे.
या पार्श्वभूमीवर, भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी, कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी अनेक मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली.
“न्यायालयाच्या या निर्णयाने मराठा समाजावर अन्याय झाला आहे. गायकवाड समितीचा जो अहवाल होता, तो न्यायालयाकडून पूर्णपणे धुडकावून लावण्यात आला आहे. आता यावर तोडगा काढता येईल, यासाठीच हा मराठवाडा, खान्देश, असा दौरा काढला असून याचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे, असं राजेंनी सांगितलं.
तसेच, “आंदोलन करणे हा या लढ्याचा एक भाग आहे. हे आरक्षण मिळवून देण्यासाठी नेमका काय मार्ग काढता येईल, राज्य आणि केंद्र सरकारला याबाबत काय सूचना करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी, मराठा समाजाच्या लोकांची मतं जाणून घेण्यासाठी हा दौरा आहे’ असं देखील त्यांनी सांगितलं.
यावेळी, “महामारीमुळे आंदोलन करणे चुकीचे आहे. परंतु, सगळ्यांनी आपल्या तब्येती सांभाळून आंदोलन करायचे आहे, महामारीचा उद्रेक हा मराठा समाजामुळे झाला असं कुणी म्हणता कामा नये,” अशा शब्दांत त्यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन केलं आहे. तसेच, “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर २७ किंवा २८ तारखेला मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची भेट घेणार असून, मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहे. त्यानंतरच मराठा आरक्षणासाठी माझी काय भूमिका आहे, ती जाहीर करेन, असं म्हणत त्यांनी अजूनही आपल्या भूमिकेबद्दल गुप्तता ठेवली आहे.
Read Also :
- सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात “मूक नव्हे, बोलका मोर्चा” काढणार – विनायक मेटे
- मराठा आरक्षण :आक्रमक आंदोलनकर्त्यांनी दाखवले मंत्रालयासमोर काळे झेंडे
- ‘येत्या २ दिवसांत पदोन्नीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक न लावल्यास…’ ऊर्जामंत्र्यांचा इशारा
- ‘मालक असावा टाटांसारखा’; कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही पगार देणार, घर आणि शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार
- राज्यातील लॉकडाऊन ४ टप्प्यात उठवणार; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?