मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालायने रद्द केल्यानंतर, मराठा समाजाच्या वाढत्या रोषाला शांत करण्यासाठी, ठाकरे सरकारने राज्यपालांकडे जाऊन, या मुद्द्यावरून राष्ट्रपतींना लिहिलेले पत्र सुपूर्त केले. तसेच, यांनतर विशेष न्यायाधीशांची एक समिती नेमून, त्यांना या कायद्यातील त्रुटी शोधण्याचे काम दिले. मात्र यानंतरही पुढे काही ठोस असे निर्णय आणि पाऊल आघाडी सरकारकडून उचलले जात नसल्याने, नाराज आणि संतप्त मराठा समाजाने आता पुन्हा मोर्चे आणि आंदोलने करण्याचा निश्चय केला आहे.
या पार्श्वभूमीवर, आज मंत्रालयाच्या बाहेर काही मराठा आंदोलक आंदोलन करणाच्या तयारीत होते, मात्र त्याआधीच या आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक माहितीमध्ये, आरक्षणाच्या मुद्यावरून हे आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. त्याचवेळी त्यांना पोलिसांनी पकडले आहे.
तसेच, या धरपकडीच्या वेळी आंदोलकांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा, तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा निषेध केला गेला. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी त्यांनी केली. या आंदोलकांना सध्या माता रमाबाई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं असून, हे आंदोलक औरंगाबाद परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती चौकशीत समोर येत आहे.
दरम्यान, राज्यात १ ते ५ जून दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्याचा इशारा, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे. तसेच, ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात, मराठा आरक्षणाबाबत योग्य भूमिका मांडली नसल्यानेच हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप देखील त्यांनी, राज्य सरकारवर केला आहे.
Read Also :
- सिरम इस्न्टिट्यूटचे वक्तव्यावरून घूमजाव; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले
- ‘येत्या २ दिवसांत पदोन्नीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक न लावल्यास…’ ऊर्जामंत्र्यांचा इशारा
- ‘मालक असावा टाटांसारखा’; कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही पगार देणार, घर आणि शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार
- राज्यातील लॉकडाऊन ४ टप्प्यात उठवणार; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?
- राजभवनात कोणतं वादळ आलं की तिथं भूत प्रेत येतात