राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस देखील सतर्क राहत आहे. भूमिपूजनाच्या या पार्श्वभूमीवर कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत असून अहमदनगरमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. खबरदारी म्हणून या नोटिसा बजावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम वेळेस आपण व आपले कार्यकर्ते समर्थक किंवा आपल्या भागात कोणीही कुठल्याही प्रकारचे जल्लोष , विजय मिरवणूक , फटाक्यांची आताषबाजी, घोषणाबाजी केल्यास कार्यकर्त्यांवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असं नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
देशभरात आज (5 ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आनंद साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे.