बाळासाहेब सानप सोमवारी दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा पुन्हा ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदाच होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे. सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपमधील ही लॉबी सक्रिय झाली असून त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून आपला विरोध दर्शविण्याची तयारी सुरू केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सानप यांच्या पक्षप्रवेशापूर्वीच भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
सानप हे पंचवटी परिसरात राहतात. या भागाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं असून पंचवटीत त्यांचा दबदबा आहे. या परिसरातून 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप पक्षात आल्यास किमान 15 नगरसेवक सहज निवडून आणणे सोपे होईल, असा प्रत्येक पक्षाचा अंदाज आहे. त्यामुळे सानप यांना पुन्हा पक्षात घेण्यास भाजपकडून उत्सुकता दाखवली जात आहे. शिवाय राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने हे तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. त्याशिवाय नाशिकमध्ये मनसेची मोठी व्होटबँक असल्याने भाजपसाठी ती सुद्धा एक मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळेच भाजपने सानप यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.