मुंबई : करोना लसीच्या पुरवठ्यावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. काल राज्यात करोना प्रतीबधांत्मक लसींचा तुटवडा निर्माण होऊन, अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली. यावरून सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये खडाजंगी सुरु असून, केंद्र सरकारवर राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी नाराजीचा सूर आवळलेला आहे.
दुसरीकडे केंद्राकडून देखील राज्य सरकारवर, या आरोपांची गंभीर दखल घेत आरोप करण्यात आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.
“राज्यात करोनाची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. देशातील ५०% करोना बाधित रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस पुरवण्यापेक्षा आधी महाराष्ट्राला लस द्याव्यात”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
त्यांनी केंद्राकडून सरकारला केल्या जाणाऱ्या लसींच्या पुरवठ्यचा वेग अतिशय मंद असल्याचे सांगत, केंद्राकडून केल्या जाणाऱ्या दुजाभावामुळे जनतेचे हाल होत असल्याची टीका केली आहे.
दरम्यान, राज्याच्या करोना परिस्थितीवरून आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.