मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशा आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला आहे. तसेच, राज्यात करोना लसींचा देखील तुटवडा जाणवू लागल्याने, भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक लसीकरण केंद्रांमधील लसीकरण थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, एकीकडे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असली. तरी दुसरीकडे मात्र राज्यातील या परिस्थितीवरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.
यावरूनच आता भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लसीकरण सुरु झाल्यापासून लसी नेमक्या कोणाकोणाला देण्यात आल्या, याचा हिशोब राज्य सरकारने मांडावा अशी मागणी केली आहे.
केशव उपाध्ये यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर पाठवला आहे ज्यात, “महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचं संकट, हे आघाडी सरकार निर्मित संकट असून, लसीकरण सुरू झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांमध्ये नेमक्या कोणाला लसी दिल्या गेल्या आहेत? याचा सारा तपशील त्यांनी समोर मांडावा अशी मागणी केली आहे.
तसेच त्यांनी, ‘खरोखर पात्र असणाऱ्या आणि नियमांत बसणाऱ्यांनाच लसी देण्यात आल्या, की नियम-अटीत न बसणाऱ्यांनाही लसी दिल्या गेल्या?, अशी शंका घेत, पहिली अट होती ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देणे. त्याकाळात काही लाडक्या लोकांना लसी देण्यात आल्या का? असा सवाल देखील सरकारला केला.
३ लाख लसी सरकारने राखीव ठेवल्या आहेत, त्या का ठेवल्या आहेत? हे विचारताना त्यांनी, नियम मोडून कोणाला लसी देण्यात आल्या का? दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आल्या, त्याकाळात नियम मोडून काही लसी देण्यात आल्या का? या सगळ्याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील लसीचा तुटवडा, लसी कमी असल्याचं संकट हे महाविकास आघाडी सरकार निर्मित संकट आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून नेमक्या लसी कोणाला दिल्या? नियम, अटीत बसणाऱ्यांनाच दिल्या का? याचा हिशोब महाविकास आघाडी सरकारने दिला पाहिजे.
– @keshavupadhye pic.twitter.com/S26FIOFuQL— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 10, 2021