मुंबई : देशभरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातदेखील अशीच परिस्थिती असून, याचा मोठ्या फटका आरोग्य यंत्रणेला बसत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर, बेड्स, लस यांची राज्यात कमतरता जाणवत आहे, मात्र यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, “केंद्राकडून रेमडेसिविरचा मोठा साठा राज्याला मिळाला आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे. मात्र जे बोलघेवडे लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात, त्यांना इतकंच सांगू इच्छितो की, इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नावाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता टीका केली आहे.
तसेच, “जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. केंद्राची राज्याला मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये,” असा निशाणा देखील त्यांनी राऊत यांच्यावर साधला आहे.
यावेळी त्यांनी, पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. मात्र एखाद्या राज्याला वेगाने लसीकरण करायचं असल्यास, बाजारात लस उपलब्ध आहेत. मात्र आता वेगवेगळी वक्तव्यं का केली जात आहेत, ट्विट डिलीट का केली जात आहेत, याची मला कल्पना नाही, असं म्हणत महाविकास आघाडीत एकवाक्यता हवी, असा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.