मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या परिस्थितीवरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात टीकायुद्ध सुरु असलेले पाहायला मिळत आहे. यातच आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी, शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
संजय राऊत हे सातत्याने केंद्र सरकार आणि विरोधकांवर सामनातून आणि माध्यमांसमोर येऊन आगपाखड करत असतात. परंतु, मध्यंतरी याच संजय राऊतांवर एका महिलेने आरोप केलेले आहेत. दरम्यान, या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
संजय राऊत यांचं रोज उठून नाटक चाललंय. मांजर डोळे मिटून दूध पितं, म्हणजे तिला वाटतं कोणीही तिला बघत नाही, हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो, अशी टीका देखील त्यांनी राऊत यांच्यावर केली.
तसेच, संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले, तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केले, तर आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात, मग केंद्र सरकार काय झोपा काढतंय का? हा दुटप्पीपणा चालणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना खडसावले.