उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि गंभीर बाबींसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाची लवकरात लवकर बैठक घेऊन आढावा घ्या, अशी मागणी करणारे पत्र भाजपचे सरचिटणीस आणि आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना पाठवले आहे.
सुजीतसिंह ठाकूर यांनी गडाख यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कोरोना बाधित आणि मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पहिला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एकदाही लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची उपाययोजनांसदर्भात विचारविनमयाची बैठक झालेली नाही. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा, आरोप देखील त्यांनी केला.
प्रशासनावर नियंत्रण कोणाचे?
पालकमंत्री महोदय उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि गंभीर बाबींसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाची बैठक घेऊन आढावा घ्या. pic.twitter.com/YWx3kXZaD7— Sujitsingh Thakur (@sujit_thakurmlc) July 14, 2020
सुजीतसिंह ठाकूर यांनी पत्रात पुढे म्हटले की, प्रशासनावर नियंत्रण कोणाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 418 झाली असून, 17 जणांचे मृत्यू झाले आहेत. परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कोव्हिडसाठी खर्चास मान्यता दिलेला निधी खर्च, शेतकऱ्याशी निगडीत प्रश्न, निधीची उपलब्धता, खर्च यासह विविध प्रश्नांवर चर्चा होऊन कामे मार्गी लागली पाहिजे, या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक तातडीने घ्यावी, अशी मागणी या पत्रात ठाकूर यांनी केली आहे.