मुंबई : राज्यात करोना विषाणूच्या संसर्गामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज ६० हजारांवर करोना बाधित रुग्ण राज्यात सापडत असून, त्यामानाने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज रात्रीपासून राज्यात कठोर लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे.
दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांवर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. लॉकडाऊन, लसीकरण आणि औषध पुरवठा, या सगळ्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
यातच आता काँग्रेसचे आमदार आमदार आशिष देशमुखयांनी आघाडी सरकारकडून करोनाला रोखण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न तोकडे असल्याचे सांगत, महाराष्ट्रामध्ये करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान दोन महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे, असे ट्विट करून सांगत ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे.
आता या पत्रावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणिबाणी लागू करा, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले आहे. राज्यातले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे, आता काँग्रेससुद्धा बोलू लागली आहे. राज्याला ना धोरण ना दिशा, ही आजची अवस्था आहे. हे आता आता सत्ताधारीही कबूल करू लागले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात आरोग्य व आर्थिक आणिबाणी लागू करा कॅाग्रेस आमदाराचे पंतप्रधान मोदीना पत्र. राज्यातल @OfficeofUT सरकार पूर्ण अपयशी असल्याच आता कॅाग्रेससुध्दा बोलू लागली आहे. राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था आता सत्ताधारी कबूल करू लागले आहेत. https://t.co/D8uvJRvUGd
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 21, 2021
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा ६० हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. काल राज्यामध्ये करोनाचे ६२ हजार ०९७ नवे रुग्ण सापडले, तर दिवसभरात ५१९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ५४ हजार २२४ जणांनी करोनावर मात केली होती.