मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाच राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. मात्र, एसटी महामंडळाच राज्य सरकारमध्ये विलनीकरण करणे, तात्काळ शक्य नसल्याचं राज्य सरकारने सांगितल आहे. याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या मागण्या मान्य न केल्यामुळे कर्मचारी पण संतप्त झाले होते. एसटी महामंडळाचा समावेश राज्य सरकारच्या अंतर्गत करावा अशी आग्रही मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. पण ती मागणी राज्य सरकारने मान्य करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात संतापाची भावना निर्माण झाली होती.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांना संपासाठी भडकावण्याचं काम करून राजकारण करत आहेत असा आरोप केला होता. आता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. “एसटी कर्मचाऱ्यांबाबत बोलणं हे जर राजकारण असेल तर ते आम्ही सदैव करणार” असं त्यांनी म्हटलं आहे
भाजप आमदार एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय अनेक भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाच्या मागणीबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे.
याशिवाय पाटील यांनी ट्विटमध्ये राज्य सरकारवर टीका करताना, “एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जी दडपशाही चालली आहे. ती अत्यंत भीषण आहे. आत्तापर्यंत 29 आत्महत्या झाल्या. मग आंदोलकांनी मोर्चासुद्धा नाही काढायचा का?” असा सवाल विचारला आहे. राज्य सरकारने सध्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे.