कोल्हापूर – मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर राज्यभरातून नाराजीचे पडसाद उमटत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर संताप व्यक्त करत राज्य सरकारला वेठीस धरत हल्लबोल केला आहे.
आज तरी सरकार पूर्ण तयारीनं जाईल आणि स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा होती. पण कुठलीही पूर्वतयारी नसल्यानं कुठलेही मंत्री दिल्लीत पोहोचले नाहीत. अतिशय ताकदीनं जी केस लढवायला हवी होती, ती लढवलेली नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोर्टानं मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला त्याचा मी निषेध करतो, आज न्यायालयात तेच तेच मुद्दे पुन्हा मांडल्यामुळे न्यायमूर्तींनी विचारलं तुम्ही नवीन काय मुद्दे आहेत. नवीन मुद्दे उपस्थित करायचे असतात, सरकारकडून नवीन कोणताच मुद्दा मांडला नसल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. ती सरकारची एक प्रकारे नाचक्की आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.