पुणे : महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?; अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांतदादा म्हणतात. मग पंतप्रधानांनाही लोकसभेचं अधिवेशन घेण्याची हिंमत आहे की नाही यावर चर्चा होऊ शकते, असा चिमटा जयंत पाटलांनी काढला. कोरोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणं थांबवलं आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरही भाष्य केलं. लॉकडाऊनबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी रणनीती ठरवावी लागेल. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. पण परिस्थिती थोडी बरी आहे. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही ते म्हणाले.
मी पाच वर्ष खातं संभाळलयं.!
मराठा आरक्षणाचा कायदा दोन वर्षे असताना ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना अजून नियुक्तीपत्रं देण्यात आलं नाही. कायद्याचा खल केला जात आहे. नियुक्तीपत्रं कसं द्यायचं हे मला शिकवून नका. मी पाच वर्षे खातं संभाळलं आहे. आजच्या आज मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश काढा, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.