मुंबई : कोरोनाचे संक्रमणाचा धोका पुण्यात वाढत आहे. तिथे अधिक लक्ष द्यायला हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आधीपासूनचे म्हणणे होते. तिथे घाईघाईने लॉकडाऊन उठविण्यात आला, त्यालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोध होता, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथे उभारण्यात आलेली कोविड सेंटर व्यवस्थित सुरू आहेत. काही त्रुटी असू शकतात. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध होण्याआधीच ते सुरू करण्यात आलं होतं, असं आता समोर आलंय. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोष देण्याची पद्धत चुकीची असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
पांडूरंग रायकरांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली, असे मला समजले आहे. दुर्दैवानं त्यांना अँब्युलन्स मिळायला उशीर झाला. पुण्यासारख्या शहरात हे होणं बरोबर नाहीय. सरकारने यापुढे काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
पुण्यात मुंबई पॅटर्न
पुण्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबई पॅटर्न राबविला जात आहे. काही अडचणी असतील त्या दूर करून जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील याची जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे. राज्य सरकार किंवा महापालिकाच नाही, तर विरोधकांचीही जबाबदारी आहे, जनता आणि शहर हे सर्वांचेच आहे, असे राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.