पुणे : साताऱ्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद साताऱ्यासह महाराष्ट्राना पाहिला आहे. दोघांमधील राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी दोन्ही नेते सोडत नाहीत. मात्र मागील काही दिवसात दोन्ही नेत्यांमधील संघर्ष मिटल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीवेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावेळी शरद पवारांनी मध्यस्थी करून देखील हा वाद मिटला नव्हता. मात्र आता दोन्ही नेत्यांमधील वाद मिटल्याचे पाहण्यास मिळत आहे.
पुण्यातील एका विवाह सोहळ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांची चक्क गळाभेट झाली.
याआधी सातारच्या शासकीय विश्रामगृहामध्ये दोन्ही नेत्यांची अचाकन भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. त्यानंतर आता पुण्यात दोन्ही नेत्यांची चक्क गळाभेट झाल्याने दोघांमधील मतभेद संपल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.