नागपूर – राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी महाविकासआघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. या निवडणुकीतही विजय मिळवायचाच या अनुषंगाने महाविकासआघाडीने विशेष रणनीती आखल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
5000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींवर महाविकासआघाडी लक्ष केंद्रित करणार आहे. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये महाविकासआघाडी एकत्र निवडणूक लढवेल. जास्तीत जास्त ग्राम पंचायती जिंकण्याचा महाविकासआघाडीचा निर्धार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.