बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने RJD सोबत महाआघाडी करत 70 जागा लढवल्या होत्या. त्यात काँग्रेसला फक्त 19 जागा जिंकता आल्या. त्यामुळे RJD नेते तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं. काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरुनही RJD ला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली.
बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसच्या विशेष समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष बनवण्यावर विचार विनिमय करण्यात आला. मात्र, सोनिया गांधी यांनी स्वत:ला या बैठकीपासून दूर ठेवलं. सोनिया गांधी या सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांच्या त्या आई आहेत. त्यामुळे त्यांनी या बैठकीपासून दूर राहणं पसंत केलं. समितीवर कुठलाही दबाव पडू नये आणि समिती स्वतंत्रपणे पक्षाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा करेल, हा त्यामागील उद्देश होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.