अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. तर आघाडीच्या नेत्यांकडून अनेक भाजप नेते पक्षाला रामराम ठोकणार असल्याचा दावा करत आहे. या जुगलबंदीमध्ये आता एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी काँग्रेसने पाठिंबा काढताच ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे.
‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार पडेल थंड… लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी, जाणार आहे महाविकास आघाडी’, अशा आपल्या कवितेच्या विशिष्ट शैलीत आठवलेंनी ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे.
यूपीए अध्यक्षपदावरून काँग्रेस पाठिंबा काढून घेऊ शकते, असे आठवले यांनी म्हटले आहे. आठवले म्हणाले की, शरद पवार यांचे नाव यूपीएच्या अध्यक्ष पदावर यावे, असे शिवसेनेचे मत असले तरी कॉंग्रेस पक्ष ते अजिबात मान्य करणार नाही. कारण राष्ट्रवादी हा महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष आहे. शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष पद देण्याची संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. ऊत यांच्या मागणीमुळे सरकारमध्ये मतभेद होतील, व हे सरकार पडू शकते.
काँग्रेसचा वेळोवेळी अपमान होत असेल तर त्यांनी देखील शिवसेना व राष्ट्रवादी सोबत न राहता सरकारचा पाठिंबा काढावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.