मुंबई : करोना संसर्गामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सात महिन्यांपासून बंद असून आहेत. आता अनेक निर्बंध शिथील होत असताना सिनेमागृहांची दारेही लवकरच उघडणार आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी चर्चा केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमाकडे बोट दाखवत एकप्रकारे बॉलीवूडला सावध करण्याचे काम केले.
‘मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहेत. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेसृष्टी हा एक मोठा मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात, असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी बॉलीवूडच्या बदनामी षडयंत्र रचणाऱ्यांना फैलावर घेतले. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकार सहन केला जाऊ शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितले.
बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
अभिनेत्री कंगना राणावतने केलेले आरोप, मीडिया ट्रायल ही बाबही चर्चेत राहिली. दुसरीकडे उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याच्या घोषणेने या सर्वातून वेगळेच तर्क लावले जाऊ लागलेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
सुशांत सिंह प्रकरणात रियाला जामीन मिळाला असला तरी बॉलीवूडवरील ड्रग्जचं धुकं अद्याप दूर झालेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या पहिल्या फळीतील कलावंत, निर्माते आणि दिग्दर्शकांना लक्ष्य करण्यात येत आहे. बॉलीवूडमध्येच यावरून दोन गट पडले आहेत. त्यात राजकीय हस्तक्षेपही पाहायला मिळत आहे.
Read Also
फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार ? अमृता फडणवीस यांचा शिवसेनेच्या उत्तरावर पलटवारhttps://t.co/zpTwXCbqgo#AmrutaFadanvis #Uddhavthackarey #Shivsena #BJP @fadnavis_amruta
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 15, 2020