मुंबई : राज्यात काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत, राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला महामारीवरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना, “१८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.” असं सांगितलं.
मात्र त्यांनी लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे, लगेच १ मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती देखील सविस्तर स्पष्टीकरण देत संध्याकाळी दिली. दरम्यान, आता यावरून भाजपचे नेते, गोपीचंद पडळकरांनी राजेश टोपेंना लक्ष्य केलं आहे.
सकाळच्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणार असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले त्यानंतर संध्याकाळच्या ४ वाजताच्या पत्रकार परिषदेत लसीकरण १ मे पासून होणार नाही म्हणाले. मग सकाळची जी प्रेस घेतली ती गांजा ओढून घेतली का? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे.
त्याचसोबत भाजपची जिरवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले, पण भाजपचं काम चांगलं असल्याने त्यांना ते करता आलं नाही. म्हणून आता सत्ताधारी महाराष्ट्रातील जनतेची जिरवत आहेत. राजकारण करण्यापेक्षा या सर्वामधून बाहेर येऊन राज्यातील मृत्यूचे दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असंही भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.