मुंबई : येत्या १ मे पासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा संपूर्ण देशभरात सुरु होत असून, या टप्प्यात देशातील १८ वर्षावरील सर्वाचं लसीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला देखील मोठ्या प्रमाणात लस पुरवठा लागणार आहे. मात्र राज्यातल्या लसीकरण मोहिमेबाबतचा निर्णय, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत होईल असे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
मात्र, सीरम आणि भारत बायोटेकने आपापल्या लसीचे दर निश्चित केले असून, त्यांच्या उत्पादनातील ५०% साठा केंद्र सरकारसाठी राखीव आहे व उर्वरित साठा राज्य सरकारला खरेदी करावा लागेल. मात्र २० मे पर्यंतचा साठा आधीच केंद्र सरकारने बुक करून ठेवला असल्यामुळे, २० मे पर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही असं सीरम इन्सिट्यूटने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोसेस लागतील. त्याच्या उपलब्धते विषयी आरोग्य विभागामार्फत सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच, ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे सांगितले आहे.
तसेच, यानंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.