राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात काल खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली. यानंतर व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात राज्यभरातून पडसाद उमटताना दिसत आहेत.
यापुढे असा निरर्थक वाद होऊ नये, यासाठी विधानसभा, लोकसभा सदस्याच्या शपथविधी मसुद्यात जसं ईश्वर साक्ष असा उल्लेख आहे, तसाच त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने असा उल्लेख करावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी केली आहे.
कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी या निमित्ताने एक वेगळीच मागणी केली आहे. कन्नड तहसिल कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसिलदारांना निवदेन दिले. या निवेदनात राजपूत यांनी घटनेत दुरुस्ती करून आमदार, खासदारांच्या शपथविधीच्या मसुद्यामध्ये ईश्वर साक्ष शपथ घेतो की, या प्रमाणचे छत्रपती शिवाजी महाराज साक्ष शपथ घेतो की, असा उल्लेख करावा, अशी मागणी केली.