मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंग हेच आता अडचणीत सापडलले आहेत. याचे कारण म्हणेज, क्रिकेट बुकी सोनू जालान याने थेट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरच पैसे उकळल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात बुकी सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण तातडीने राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
याबाबत बुकी सोनू जालान याने अधिक खुलासा करत सांगितले आहे की, २०१८ साली परमबीर सिंग यांनी मोक्का लावून माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केले आहेत. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
तसेच, केतन तन्ना या व्यक्तीनेही परमबीर सिंग यांनी आपल्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्याकडून १ कोटी २५ लाख रुपये उकळले. याप्रकरणी परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेचत्यांची चौकशी व्हावी, असे सांगतानाच त्याने, याप्रकरणात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी देखील केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी, आपण परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचं पत्र गृहमंत्रालयाला पाठवलं आहे. परमबीर सिंग यांनी, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप करत, मी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेतली, तर ते माझ्या विरोधात सुरु असलेली चौकशी मार्गी लावतील, असा दबाव टाकण्यात आला असल्याचे सांगितले आहे. यानंतर त्यांनी हे पत्र पाठवल्याने या प्रकरणात वेगळे वळण लागले आहे.`