मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आलं आहे. “महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं,” असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले होते. यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना चांगलंच झापलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, “केवळ राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलं असून, त्याला कोणताही आधार नाही. हा वाद अनेक वर्षाचा आहे. कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर निवडून यायचे. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली,” असं सांगत पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं.
“बेळगावचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महाजन समितीचाही अहवाल आहे. तसंच ज्यावेळी दोन राज्यांच्या सीमांचा वाद असतो त्यावेळी केंद्र सरकारने हस्तक्षेप करायचा असतो … एकतर्फी बोलायचं नसतं किंवा तसे निर्णयही घ्यायचे नसतात”, असं म्हणत अजित पवारांनी केंद्रावर निशाणा साधला.
“सीमा भागातील वादग्रस्त भाग आमचा आहे असा दाखवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तसंच या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध” असल्याचं अजित पवार म्हणाले.