मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात बोलताना राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे ‘बॅकवर्ड’ असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्कील होत आहे, याची जाणीव त्यांना नाही. आपला समाज केवळ आपल्यामागे फरपटत यावा, अशीच यातील अनेकांची इच्छा आहे. गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते, असा आरोप केला होता.
यावरून आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या मराठा नेत्यांची नावे सांगावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांना केले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षण कुणाला नकोय? त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे. रोज मतमतांतरे होण्यापेक्षा सकल मराठा समाजाचा एकच आवाज आला पाहिजे. रोज वेगवेगळी विधाने करून गोंधळ निर्माण केला जात आहे.
चव्हाण यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मराठा आरक्षणाबाबतची माहिती दिली.