मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत गायलेलं ‘तिला जगू द्या’ गाणं रिलीज झालं. टी सिरीजने या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर अमृता फडणवीस यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.
सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांबद्दल काही वाईट शब्दही उच्चारण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ गाण्याबाबतच नाही तर इतरही विविध मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांच्यावर काही राजकीय लोकांनी टीका केली. या सर्व मुद्द्यांवर आज अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी, ‘जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत’, असं वक्तव्य केलं होतं. याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचं देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं.
घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जात आहे, त्याबद्दल बोलायचं तर आम्ही कोणाच्याही घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कोणाच्याही घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. जर घरच्यांवरील टीकेबाबत बोलायचं झालं तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण मी स्वत: आहे.
माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलतात, काय लिहितात, ट्विटरवर काय टाकतात हे साऱ्यांना माहिती आहे. पण मी त्याचा कांगावा करत नाही, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तसेच, “मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर देईन”, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
Read Also :
‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, नारायण राणेंची टीका
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा