कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोरोनाचे रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयांना तसेच क्वारंटाईन सेंटरला भेट देत आहेत. आज ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांना देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. याच पार्शवभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद देखील घेतली.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या निमित्ताने तयार झालेल्या स्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे. त्यातूनच या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलीच गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझा जो अनुभव आहे त्या प्रमाणे पोलीस आयुक्तांच्या समितीला अंतर्गत बदलीचे अधिकार असतात. या बदल्यांबाबत आयुक्त गृहमंत्र्यांना माहिती देतात. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतंत्र असताना गृहमंत्री या बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देतात. यानंतर या बदल्या होतात. मात्र, या प्रकरणात आयुक्तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिलीच नाही. नंतर हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या बदल्यांना स्थगिती दिली.”
दरम्यान, कोरोना रुग्णांचे रुग्णालयात होणारे हाल, अभावी सेवा आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार मध्ये असलेल्या समन्वया अभावी या कोरोनाचा प्रभाव वाढत चालला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.