रायगड : तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुजरातचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली होती. सोबतच 1000 कोटी रुपयांचा मदत निधी देखील जाहीर केला. मात्र, महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याने पंतप्रधानांवर टीका होत आहे. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातला मदतीचे कारण सांगितले आहे.
पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला याचं कारण म्हणजे लँडफॉल गुजरातमध्ये झालं. गुजरातमध्ये लँडफॉल झाल्याने प्रचंड नुकसान झालं. 45 नागरिकांचा मृत्यू झाला. गावंच्या गावं 100 टक्के उद्वस्त झाली त्यामुळे पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला, तातडीची मदत केली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर राज्यांनाही मदत करण्यात येईन असं जाहीर केलं आहे. तौत्के चक्रीवादळाचा परिणाम केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दमण, दीवमध्ये आहे एकूण आठ राज्यांत चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे या सर्व राज्यांना केंद्र सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याने आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत ? असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे. तर ‘पंतप्रधान महाराष्ट्राला दीड हजार कोटींची मदत जाहीर करतील,’ असा उपरोधिक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
Read Also :