मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावरून एकमेकांवर टीकेची झोड उठवत असून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर एकत्रिपणे निशाणा साधला असून, “ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे, ते अतिरिक्त आरक्षण मिळाले पाहिजे अशीच राज्य सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे.
मात्र, देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहेत. त्यांनी कधी ओबीसी, तर कधी मराठा समाजाला भडकवण्याचे असले राजकारण आता बंद करावे”, अशा शब्दांत स्पष्ट इशारा दिला आहे.
तसेच, फडणवीस हे स्वतः वकील आहेत. त्यामुळे वकीलांना ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ यापध्दतीने बोलता येते. हे आरक्षण, कायद्याच्या चौकटीत राहून केले असल्याचे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने तर राज्याला अधिकारच नाही असे सांगितले आहे. त्यामुळे राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठीच केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे, असे सांगत, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला, सर्वोच्च न्यायालयात, मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे, अशी भूमिका मांडण्याची विनंती करावी,” असा सल्ला देखील त्यांनी फडणवीसांना दिला आहे.
Read Also :