वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी नगरसेवक म्हणून लोकहितासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवणारा एक तरुण मुलगा पुढील २२ वर्षानंतर थेट राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतो, ही काही साधीसुधी गोष्ट नाही. १२ कोटी लोकांचं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी या माणसाने अशी पार पाडली, जशी कोट्यवधी जीवांचं रक्षण ही जननी करते. केवळ जनहिताचं आणि राष्ट्रहिताचं स्वप्न मनी बाळगणारे तरुण तडफदार नेते, माझे परम मित्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस जी यांचा आज वाढदिवस ! मुळात देवेंद्र जी यांच्या कार्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. अगदी बालपणापासूनच मुत्सद्दी धोरण बाळगलेल्या देवेंद्र जी यांच्याबद्दल वाचलेला एक प्रसंग मला आठवतोय, तो म्हणजे आणीबाणीच्या काळात गंगाधरराव फडणवीस यांना इंदिरा गांधी यांनी अटक केली होती. यावर *’माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही’, असे वयाच्या सहाव्या वर्षी आईला बजावून सांगणाऱ्या त्या कोवळ्या मुलाने आज स्वबळावर राजकीय क्षेत्रात वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. राजकीय बुद्धिचातुर्य आणि कौशल्याच्या जोरावरच महाराष्ट्रात भाजपाचा पहिलाच मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
वैयक्तिक सांगायचं झालं तर देवेंद्र जी यांच्याकडे अफाट नेतृत्वशक्ती आहे. नगरसेवक ते मुख्यमंत्री या प्रवासामुळेच त्यांना तळागाळातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेबद्दल आपुलकी आणि त्यांच्या परिस्थितीची जाण आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या देवेंद्र जी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच मोठा जनाधार प्राप्त केला. शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे ? पण मला असं वाटतं नावातच सगळं काही आहे, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे नाव घेतल्यावर जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचं चित्र डोळ्यांसमोर तरळतं. ज्याप्रकारे मावळ्यांनी स्वराज्य उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली त्याचप्रकारे एक शिवरायांचा मावळा बनून महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आणि सुराज्य निर्माण करण्यासाठी देवेंद्र जी यांनी परिश्रमपूर्वक कार्य केले आहे. आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मानदेखील त्यांनी मिळवला.
जनतेसाठी त्यांचे कार्य पाहून त्यांच्या मनात सतत ‘के दिल अभी भरा नहीं’ हीच ओळ तर नसेल ना, हेच मला वाटतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपाच्या संस्कारांचे बाळकडू लाभलेल्या देवेंद्र जी यांच्या कार्याची दखल घेत मायबाप जनतेने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ या घोषणा दिल्या. राष्ट्रीय स्तरावरदेखील आपल्या कार्याचा गौरव व्हावा, असे अनेक नेते भाजपा महाराष्ट्राने या देशाला दिले. यामध्ये प्रामुख्याने स्व. प्रमोद महाजन जी, स्व. गोपीनाथ मुंडे जी आणि नितीन गडकरी जी यांचे नाव घेतले जाते. मात्र यानंतर महाराष्ट्रातून राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव उंचावण्याची धमक केवळ देवेंद्र जी यांच्यामध्येच आहे, हे मी ठणकावून सांगतो.
मी माझ्या भाषणातही एकदा म्हणालो होतो, ‘कोरोनाच्या काळात जनतेच्या कामासाठी देवेंद्रजींइतकं कोणताच नेता फिरला नसेल’, याचा मला गर्व आहे. देवेंद्र जी यांनी कोविड-१९ शी लढा देऊन त्यावर मातसुद्धा केली आहे. नैसर्गिक आपत्ती असो, शेतकऱ्यांवर आलेलं संकट असो किंवा जागतिक महामारी असो… देवेंद्र जी यांनी थेट त्या क्षणी हजर राहून बळीराजाला, नुकसानग्रस्तांना आणि रुग्णांना आधार दिला, त्यांचे दुःख समजून घेतले, हा त्यांचा मोठेपणा आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांच्याइतका झटणारा नेता कदाचित महाराष्ट्र पुन्हा पाहू शकणार नाही. कुसुमाग्रजांच्या निर्धार कवितेत एक ओळ आहे, ‘जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे’ ! जो मराठा समाज आपल्या हक्कांसाठी लढत होता आणि त्याच वेळी मराठा समाजाची काही राजकीय नेत्यांद्वारे आणि वृत्तपत्रांद्वारे सर्वत्र खिल्ली उडवली जात होती त्या मराठ्यांना पुन्हा एकदा पर्वतासारखे श्रेष्ठत्व देऊन देवेंद्र जी यांनी आरक्षण देऊ केलं आणि ते उच्च न्यायालयात टिकवलं. देवेंद्र जी यांची जलनीती आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे ध्येय जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.
आपल्या पक्षाच्या ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ या तत्वावर कायम राहून ते आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द केवळ देवेंद्र जी यांच्याकडेच आहे, असे मला वाटते. राजकारणातला दांडगा अनुभव, उत्कृष्ट वक्तृत्व आणि भाषाशैली, समाजकार्याची ओढ या सर्व गोष्टी क्वचितच एखाद्या राजकीय नेत्यामध्ये पाहायला मिळतात, त्या सर्व देवेंद्र जी यांच्यामध्ये आहेत. पौराणिक कथांमध्ये अद्वितीय अशा फिनिक्स पक्षाबद्दल तुम्ही ऐकलच असेल, हा पक्षी चांगल्या गुणांचा आणि विश्वासाहर्तेचा प्रतीक मानला जातो. त्याचे पंख भरभराटीचे प्रतिनिधित्व करतात. कितीही संकटं आली तरी राख झालेल्या त्या शरीरातून पुन्हा झेप घेतो. अपयशाने कधीही खचून जात नाही. देवेंद्र जी राजकारणातील हाच फिनिक्स पक्षी आहेत. त्यांच्या नेतृत्वात भाजपा महाराष्ट्रात आज एक बलाढ्य पक्ष म्हणून उदयास आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा राज्यातील नागरिकांच्या हितासाठी लढा देत आहे. या संघर्षमयी प्रवासात देवेंद्र जी यांना सदैव यश लाभो आणि त्यांच्या हातून अशाच रीतीने महाराष्ट्राची आणि देशाची सेवा घडो, हीच सदिच्छा !
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही…!
‘जीवेत शरदः शतम्’
आमदार चंद्रकांतदादा पाटील