महाराष्ट्रातील पालकवर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे़ त्यामुळे फीससाठी पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
फीससंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असली तरी या निर्णयाविरोधात आम्ही सर्वाेच्च न्यायालयात जात आहोत, असेही त्या म्हणाल्या. तूर्तास सर्वांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी एखादी संस्था पासवर्ड देत नसेल तर मला कळवा, शिक्षण मिळणे हा मुलांचा अधिकार आहे आणि शिक्षण देणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पाल्यांच्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यासाठी संस्थाचालकांकडून पालकांना सक्ती होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, संस्थाचालकांचे म्हणणेही लक्षात घेतले आहे. त्यांच्यासमोर शिक्षकांचा पगार आणि इतर खर्च आहेत. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होत्या. कामगार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, काहींची पगार कपात झालेली होती व आजही अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार धोक्यात आहेत.