डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहाची दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच घरातील कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेने शांत राहावे, असे आवाहन केले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी दोषींविरोधात कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
Mumbai: Premises of Dr BR Ambedkar's house 'Rajgruha' was vandalised by unidentified persons, earlier today. CCTV cameras were also damaged. Police at the spot. #Maharashtra pic.twitter.com/mV7uuDCFCv
— ANI (@ANI) July 7, 2020
बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. मंगळवारी सायंकाळी येथे तोडफोड झाली.
राजगृहावर दोन व्यक्ती आले होते, ही गोष्ट खरी आहे. या दोन व्यक्तींनी नासधूस केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्नही केला. राजगृहावर सर्व पोलीस आणि अधिकारी पोहोचले असून चौकशी सुरू आहे, पोलिसांनी अत्यंत चोख काम केले आहे. या प्रकरणी सर्व जनतेनं शांतता राखली पाहिजे. राजगृहाच्या आजूबाजूला गर्दी करू नका, असे प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नागरिकांना शांतता व संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही.