पुणे : राज्यात करोना बाधित रुग्णांची आणि करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, आरोग्य सुविधांच्या तुटवड्यामुळे राज्यात भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातही करोनाच्या साथीने थैमान घातले असून, या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील करोना परिस्थितीचा आज आढावा घेतला. यावेळी त्यांनी विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. पुण्यात करोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
राज्यातील नागरिकांचा जीव महत्वाचा आहे, तो वाचावा यासाठी सरकारकडून हे कडक निर्बध लावले गेले आहेत, तसेच ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीचे शक्य ते सारे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र नियमांचे पालन नाही केले तर करोना होतो. हा अनुभव आहे. या परिस्थितीत तुम्हाला जरी मुख्यमंत्री केलं तरी काही करता येणार नाही. त्यामुळे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
तसेच, पुण्यात विकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी पूर्ण प्रतिसाद दिला, त्याचे अजित पवार यांनी कौतुक केले, तर दुसरीकडे नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, जर लॉकडाऊनला प्रतिसाद दिला नाही. तर, संपूर्ण लॅाकडाऊन लावावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी पवार यांनी केंद्र सरकारच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. केंद्राने व्हॅक्सीन आणि रेमडेसिविरच्या निर्यातीच्या निर्णयाची गरज नव्हती, पण असं म्हणलं की माझ्यावर मी राजकीय बोलतो, अशी टिका करणार असा टोलाही पवार यांनी लगावला.
दरम्यान, राज्यातील परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच लागू केलेल्या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.