मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांनी पाहिलं आहे. त्यांनी मुंबई महापालिकेला काम करतानाही पाहिलं आहे. तरीही ते आता मुंबई महापालिकेवर टीका करत आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करायला नको. देवेंद्र फडणवीस यांनी टेंशनमध्ये काहीही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे, अशी खोचक टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. मुंबईच्या एका भागात कोरोनावर नियंत्रण आणल्याने त्याचं कौतुक झालं म्हणजे संपूर्ण मुंबईचं कौतुक होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालिकेचं कौतुक केलं नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आले. त्यावर, माजी मुख्यमंत्र्यांनी असं विधानं करणं योग्य नाही. पण त्यांनी सार्वजनिकरित्या भाष्य केलं असेल तर त्यावर बोलावं लागेल. फडणवीसांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी मुंबईला काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीने असं काही बोलणं हे महाराष्ट्राला आणि मुंबईला पटण्यासारखं नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्यमध्ये काहीही बोलू नये, तसं होऊही नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे, असा टोला पेडणेकर यांनी लगावला.
लसींसाठीचं ग्लोबल टेंडर ही महापालिकेची नौटंकी होती, असा विरोधकांनी आरोप केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधकांची नौटंकी संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. नौटंकी वगैरे शब्द विरोधकांनाच लागू होतात. आम्ही चांगलं काम केलं तर त्यांना मिरची लागते. नौटंकी करण्यापेक्षा सकारात्मक होऊन लोकांना कसं वाचवता येईल हे आम्ही पाहत होतो. आमचं काम जागतिक स्तरावर पोहोचलं आहे. ते विरोधकांच्या जिव्हारी लागलं आहे. विरोधक म्हटल्यावर ते टीका करणारच. त्यांच्याकडून शाबसकीची अपेक्षा नाही. जगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला शाबासकी दिली आहे. म्हणून विरोधक काय म्हणतात त्यावर रिअॅक्ट होण्यापेक्षा आम्ही आणखी काय चांगलं करू शकतो, यावर आमचा भर आहे, असं सांगतानाच विरोधकांनी पालिकेवर टीका करण्यापेक्षा केंद्रातून लस आणण्यासाठी वजन खर्ची घालावं, असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.
Read Also :
- आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो – संजय राऊत
- ‘महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेलं, ते कळणारच नाही’
- काँग्रेसने मंत्र्यांचा आदर करावा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडावं – अॅड. प्रकाश आंबेडकर
- उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार हे कोणाला ठाऊक, ‘देवाला ठाऊक’