मुंबई : राज्यात आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत, राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला महामारीवरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना, “१८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.” असं सांगितलं.
मात्र त्यांनी लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे, लगेच १ मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती यावेळी दिली. दरम्यान, आता यावरून भाजपचे नेते, तसेच राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. एकीकडे मोफत लस जाहीर करायची, दुसरीकडे लस अपुरी आहे असं सांगायचं, जशी लस उपलब्ध होईल, तशी केंद्र सुरू झाली पाहिजेत. अमुक साठा आला, तरच केंद्र सुरू करू अशी भूमिका घ्यायची, हा जनतेवर अन्याय आहे”, अशा शब्दांत प्रविण दरेकरांनी टीका केली आहे.
लसीकरण सुरळीत व्हावं अशी केंद्राचीही मानसिकता आहे आणि आमचीही, पण नियोजनाचा भाग राज्य सरकारचा आहे. मुंबईत एक ते दीड लाख लसी उपलब्ध असताना, ४० ते ५० केंद्र बंद होती. त्यामुळे आता तरी यामध्ये राजकारण करू नका. केंद्रासोबत समन्वयातून लस उपलब्ध करून घेऊन जनतेचं लसीकरण निश्चित वेळेत व्हायला हवं. ते फार लांबणं जनतेच्या जीविताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
तसेच त्यांनी राज्यातील रेमडेसिविर पुरवठ्याच्या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. “माझी जाहीर मागणी आहे. केंद्रानं किती रेमडेसिविर दिली? राज्य सरकारकडे किती आली? याची आकडेवारी जनतेसमोर जाहीर करा. एकदा आकडेवारी समोर येऊ द्या. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर एकदाचा पडदा पडेल”, असं दरेकर म्हणाले आहेत.