अहमदनगर:- पुण्यातील टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कोविड केअर रूग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. यावरून आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आघाडी सरकारचेच आरोग्य ठिकाणावर नसल्याने सामान्यांचे आरोग्य धोक्यात दिसते. कोरोनाबाबत आघाडी सरकारची फक्त चमकोगिरी चालली आहे. प्रत्यक्षात सामान्य माणसाला कोणत्याही आरोग्य सुविधा मिळत नसल्याने, सामान्य माणसाला वणवण फिरण्याची वेळ आली आहे. अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.
विखे पाटील म्हणाले की, कोरोना संकटात आघाडी सरकारने केवळ मोठमोठ्या घोषणा केल्या. हॉस्पिटल व त्यातील बेडबाबत आकडेवारी जाहीर करून चमकोगिरी केली. मात्र सामान्य माणसाला या कठीण काळात कोणत्याही आरोग्यसुविधा मिळत नाहीत. एका पत्रकाराला पुण्यात रुग्णवाहिका मिळू नये, ही शासनव्यवस्थेची शोकांतिका आहे. असे आ.विखे म्हणाले.
पांडुरंग हा शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेचाच बळी आहे, दुर्दैवाने समाजासाठी धावणाऱ्या पत्रकारालाच उपचार मिळू नयेत, हे अतिशय दुःखद आहे. पांडुरंग यांच्या मृत्यूला जबाबदार असणार्यांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, असे आ.विखे म्हणाले.