सारथीच्या मुद्द्यावर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या बैठकीत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाला होता. छत्रपती संभाजीराजे यांना व्यासपीठाखाली बसवल्यामुळे मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला. राज्यभरात याचे पडसाद उमटले.
बैठकीत झालेल्या या गोंधळावरुन मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील प्रतिक्रिया दिली त्यांनी खासदार संभाजीराजे यांच्या समर्थकांचा निषेध केला. तसेच खासदार संभाजीराजे हे कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा मोठे नसल्याचं मत व्यक्त केलं.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “खासदार संभाजीराजे मराठा युवकांचे पुढारी असू शकतात. परंतू ते राज्यपाल, मंत्री यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. संभाजीराजेंनी आपल्या समर्थकांना त्यांची मर्यादा समजावून सांगितली पाहिजे होती. मात्र, तसं झालेलं दिसलं नाही. मुळात सारथी सारख्या जातीय व्यवस्थेतून 1000 धनदांडग्यांसाठी पैशाचा असा अपव्यय करणं योग्य नाही. यांना गरज नाही, त्यामुळे त्यावर पैसे खर्च करु नये.”
“या घटनेनंतर गोंधळ करणाऱ्यांसाठी ही संस्था निर्माण केली आहे का? त्यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या सारख्या लोकांचं पुढारपण आहे का? हे सर्व निंदाजनक आहे,” असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.