मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असून, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषद घेत, केंद्रात भाजपचे ३०० हून अधिक खासदार आहेत. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी आता मराठा आरक्षणासाठी कायदा करावा, ते कायदा करणार नसतील तर मराठा समाज त्यांना बघून घेईल, असा इशारा दिला आहे.
तसेच, समाजासाठी भाजप कायदा करत नसेल, तर त्या खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी, कायदा करण्याचं काम संसदेचं असतं, सुप्रीम कोर्टाचं नाही. जर काश्मीरसाठी केंद्र सरकार ३७० कलमचा कायदा करु शकतं, ईशान्य भारतातील राज्यांनाही विशेषाधिकार देऊ शकतं, तर मग महाराष्ट्रासाठी कायदा करु शकत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.