नुकतीच यशवंराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. एकमेकांवर वैयत्तिक चिखलफेक करण्यातच कृष्णाकाठ अक्षरशः गजबजून गेला आहे. सर्व जेष्ठ सभासदांना आता आठवण येतेय ती म्हणजे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य अत्यंत तंतोतंत पाळणारे आणि सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा ध्यास बाळगलेले खरेखुरे समाजसेवक हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असतात आणि त्यांच्यात आवर्जून नाव घेतले जाते ते म्हणजे जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांचे आणि इथून पुढेही घेतले जाणार, याबाबत कोणाच्याही मनात तिळमात्र शंका नाही.
दिवंगत सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) हे केवळ सहकारमहर्षी नव्हते तर ते एक उत्तम समाजसुधारकदेखील होते. आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड, दीनदुबळ्यांबाबत आत्मीयता, अखंड कार्यरत राहण्याची धडाडी, सदैव मदतीला धावून जाण्याची वृत्ती, संस्थात्मक तसेच रचनात्मक कार्यातून विकास घडवून आणण्याची आणि लाखो कुटुंबांच्या रोजगाराची संधी मिळवून देण्याची उर्मी ही त्यांची अंगभूत वैशिष्टये होती. आजदेखील त्यांच्यामुळे कृष्णाकाठी समृद्धी नांदलेली आहे.
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी आपल्या रचनात्मक दूरदृष्टीने आणि भविष्याचा विचार करून रचनात्मक कार्य करत, कराडलगतच्या कृष्णाकाठी नंदनवन फुलवले. सामान्य नागरिकांच्या हाताला काम देण्याचे कार्य त्यांनी केले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारातून समृद्धीच्या मार्गाकडे जात कारखाना तसेच जनतेच्या हिताची कामे घडवून आणली. आसपासच्या जनतेला आणि सभासदांच्या आरोग्यासाठी आप्पांनी कृष्णा रुग्णालयाची स्थापना केली आणि आज देखील कृष्णा रुग्णालय सर्वसामान्यांचे हक्काचे ठिकाण बनलेले आहे.
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (अप्पासाहेबांचा) जन्म कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी माधवराव मोहिते यांच्या घरात झाला. माधवरावांना तीन मुले.. त्यातील थोरले वसंतराव, मधले यशवंतराव व धाकटे जयवंतराव भोसले. पुढे वसंतराव मूळ घराण्यात राहिले आणि शेतीची विशेष आवड असल्याने त्यांनी शेतीत रमनेच पसंत केले. यशवंतराव भोसले बडोद्याला जिजाबा मोहिते यांच्याकडे आणि जयवंतराव थेट आजोळी भोसले घराण्यात दत्तक गेले.
जयवंतराव म्हणजेच आप्पासाहेब मात्र त्यावेळी वकिली करत होते. वकिलीची पदवी घेतलेल्या आप्पासाहेबांनी दूरदृष्टीने काळाची योग्य दिशा ओळखत, अत्यंत सावध पाऊले टाकली. आपल्या भागातील शेतकऱ्यांचे दैन्य आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि सहकारातून समृद्धी आण्यासाठी आणि आपल्याला काय – काय करता येईल, याचा सामाजिक विचार त्यांनी केला. समाजकार्याच्या विचाराने अक्षरशः त्यांना झपाटून टाकले होते. याचवेळी आपल्या मोजक्याच सहकाऱ्यांच्या मदतीने कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारण्याचा धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला.
कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारण्याचा निर्णय तर त्यांनी घेतला होता, मात्र मोठे अडथळे त्यांना त्यामध्ये होते. त्यांनी अनेक सामाजिक, राजकीय, भौगोलिक अडचणींचे अडथळे पार पाडले आणि आपले लक्ष्य शेवटी साध्यच केले. अखेरीस कृष्णा सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. १९६१ साली आप्पासाहेब कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले आणि पुढची सलग ३० वर्षे आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी सहकारात एक मानदंड निर्माण केला. अत्यंत सामान्य घरातून आलेल्या आप्पासाहेबांची एक सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड होणे ही काही सोपी गोष्ट नव्हती.
त्या संघर्ष काळात जयवंतराव भोसले (आप्पासाहेबांनी) आखलेल्या धोरणांमुळे आशिया खंडातील सर्वात मोठा आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम कारखाना अशी कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख सर्व जगभरात झाली होती. कारखान्याच्या उभारणीमुळे परिसरातील हजारो कुटुंबाना कामे मिळाली. रोजगार मिळत होता. हजारो लोकांचे संसार अत्यंत आनंदात होण्यामागे नक्कीच आप्पासाहेबांची दूरदृष्टी हो,ती यात मात्र शंकाच नाही. सुरुवातील १२६० टन एवढी क्षमता असणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना दोन वर्षांत १७५० टन क्षमतेचा झाला होता. १९८५ साली तर कृष्णा साखर कारखान्याने रेकॉर्ड करत आपली क्षमता ५००० टन एवढी वाढवली आणि यात खरे यश होते ते म्हणजे आप्पासाहेबांचे आणि त्यांच्या चतुर संचालक मंडळाचे.
कारखान्यातून फक्त साखर उत्पादन करणे एवढे माफक उद्दिष्ट त्यांनी कधीच ठेवले नाही. एक जबरदस्त दूरदृष्टी आणि पुढील काळाचा विचार करणे ही आप्पासाहेबांची खासियत होती. ट्रॉलीमधील ऊस क्रेनच्या साहाय्याने उचलून फिडींग टेबलवर ठेवणारे युनिट महाराष्ट्रात सर्वप्रमथम सुरु करणारे जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) होते. शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळावा, आर्थिक लाभ मिळावा यासाठी त्यांनी साखर उत्पादनासोबतच उसातून उपपदार्थ निर्मितीला देखील तितकेच महत्व दिले होते. देशातील पहिली डिस्टलरी, पाहिले कंट्री लिकर, इंडियन मेड फॉरेन लिकर, ॲसिटोन अशा उपपदार्थांच्या निर्मितीचे प्रकल्प त्यांनी सुरु केले. या सर्व आधुनिक गोष्टींमुळेच सलग २४ वर्षे सभासदांना राज्यातील सर्वाधिक दर दिला.
आअप्पांच्या कार्यकुशल कामाची घोडदौड चालू असतानाच या वाटचालीत उपसा जलसिंचन योजनांच्या निमित्ताने आणखी एक यशाचा तुरा रोवला गेला. कारखान्याला शेतकऱ्यांच्या मार्फत जादा उसपुरवठा कसा करण्यात येईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणीपुरवठा कसा केला जाईल, यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले आणि पाणी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणत त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले. कऱ्हाड तालुक्यात १७ उपसा जलसिंचन योजना उभ्या करण्याचे काम त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतातून शेताच्या पाण्याचे पाट वाहू लागले तसा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही ओसंडून वाहू लागला. कृष्णाकाठच्या परिसरात ७२ हजार एकर जमिनीने हिरवीगार शालू पांघरली आणि गावागावात आर्थिक सुबत्ता नांदू लागली. या सर्वांमागे जयवंतराव भोसले आप्पांचे कार्य मोठे होते.
काही काही संकल्पना आपल्या विचारांच्या जोरावर सर्वप्रथम कारखानदारी क्षेत्रात आणण्याचे कार्य जयवंतराव भोसले (आप्पासाहेबांनी) मोठ्या हुशारीने केले. टायरच्या बैलगाड्यांनी उसवाहतूक करण्याची कल्पना आप्पांच्या डोक्यात आली आणि त्यानंतर ती त्यांनी कारखान्यात राबविली. टायरच्या बैलगाडयांनी उसवाहतूक करण्याचा प्रयोग सर्वप्रथम आप्पांनी केला आणि नंतर ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली गेली. टायरच्या बैलगाड्यांमुळे दुप्पट उसवाहतूक झाली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी आप्पांनी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या आणि त्या तितक्याच सक्षमपणे देखील चालविल्या.
आप्पांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्थांमध्ये मयूर सहकारी कुक्कुटपालन सोसायटीने आशिया खंडातील सर्वात मोठी पोल्ट्री म्हणून त्याकाळात नावलौकिक मिळविला होता. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कृष्णा सहकारी बँक सुरु केली. ग्रामीण विकास विश्वस्त संघ छापखानादेखील सुरु केला. जनसामान्यांच्या उन्नतीसाठी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी अनेक संस्थांची उभारणीदेखील केली. ग्रामीण भागातील पैसे ग्रामीण भागातच राहावे यासाठी आणि लोकांचा आर्थिक स्तर वाढविण्याकरीता आप्पासाहेबांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. शेतकऱ्यांची पोरे शिकली पाहिजे म्हणून शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना देखील केली. आगाशिवच्या डोंगरमाथ्याला कृष्णा हॉस्पिटलची स्थापना करून अनेकांना अद्यावत पद्धतीचे उपचार अत्यंत माफक स्वरूपात मिळवून दिले.
आप्पासाहेबांनी मेडिकल कॉलेजची स्थापना केली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कारखान्याप्रमाणेच कृष्णा अभिमत विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. आज या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेतले आहे आणि अजूनही घेत आहेत. जयवंतराव भोसले (आप्पासाहेबांचे) हे सर्व काम बघून तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी आप्पासाहेबांना विधानपरिषदेचे सदस्यत्व दिले आणि आप्पा काही दिवसांतच विधान परिषदेचे आमदार देखील झाले.
सहकार, शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणी, जलसिंचन अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आप्पासाहेबांना ५ ऑगस्ट २०१३ रोजी देवाज्ञा झाली आणि संपूर्ण कृष्णाकाठ त्यादिवशी पोरका झाला. अनेकांचे कुटुंब उभारणाऱ्या आप्पासाहेबांच्या जाण्यामुळे अनेक कुटुंबात आपल्या घरातील वडीलधाऱ्याचे छत्र हरवल्याची भावना निर्माण झाली. आज जरी आप्पासाहेब आपल्यात नसले तरी देखील त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्यशैलीतून आजही ते प्रत्येकाच्या मनामनात, हृदयात जिवंत आहेत, अमर आहेत.