विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आपल्याला काही झाले तरी हीच सरकारी यंत्रणा सुखरूप ठेवेल हा त्यांचा आत्मविश्वास सरकारला व हजारो कोरोनाग्रस्तांना बळ देणारा आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे ? नव्हे, ते करायलाच हवे, असा टोला सामनातून लागवण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते समाधानी आहेत. तशा त्यांच्या भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्या. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवे, असा खोचक सवालही सामनातून करण्यात आला आहे.
राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच माजी मंत्री गिरीश महाराज यांना सांगितले होते की ‘‘गिरीश, मला कोरोना वगैरे झालाच तर एक कर, मला काही झाले तरी सरकारी इस्पितळातच दाखल कर.’’ या फडणवीसाच्या विधानाचा समाचार सामनातून घेण्यात आला आहे. फडणवीसांनी त्यांचे खास सहकारी गिरीश महाजन यांना कळकळीने सांगितले आहे की, ‘‘गिरीश, मला कोरोना वगैरे झालाच तर एक कर, मला काही झाले तरी सरकारी इस्पितळातच दाखल कर.’’ फडणवीस यांच्या या भावनेचे कौतुक होण्याऐवजी टीका होत आहे, खिल्ली उडवली जात आहे. हे काही बरोबर नाही. सध्या समाज माध्यमांवर ‘ट्रोल’ भैरवांच्या दोन टोळय़ा किंवा गट पडले आहेत व हे दोन गट एकमेकांविरुद्ध सतत दंड थोपटून उभे असतात. सरकार पक्ष विरुद्ध विरोधी पक्ष हा सामना म्हणजे एक शाब्दिक युद्धच ठरते.
फडणवीस यांना कोरोना वगैरे होऊ नये. त्यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभोच, त्यांचे बाल-बच्चे व राजकीय बगलबच्चेही सुखात राहोत ही आमच्यासारख्यांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आपल्याला काही झाले तरी हीच सरकारी यंत्रणा सुखरूप ठेवेल हा त्यांचा आत्मविश्वास सरकारला व हजारो कोरोनाग्रस्तांना बळ देणारा आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे? नव्हे, ते करायलाच हवे. विरोधी पक्षनेते समाधानी आहेत. तशा त्यांच्या भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्या. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवे?, असे अग्रलेखात नमूद केले आहे.