IMPIMP

जयंत पाटलांनंतर अशोक चव्हाणांना देखील लागले मुख्यमंत्रीपदाचे वेध…?

नांदेड –  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, अशी इच्छा व्यक्त केली. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण याना देखील मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले कि काय? अशसिह चर्चा रंगत आहे.

अशोक चव्हाण यांनी भोकरमधील एका कार्यक्रमात “मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही”, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केले आणि महाविकासाआघाडीतील नेत्यांना आता मुखयमंत्रीपदाच्या खुर्चीची स्वप्न पडायला लागली कि काय असा सवाल उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय काढायचा? आता यावरुन सत्ताधारी आणि विरोधी गोटात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. मला हे माहितीय की आमच्याकडे 54 आमदार आहे. 54 आमदारांचा कसा मुख्यमंत्री होणार? त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं. मात्र जयंत पाटील यांनी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या वक्तव्यात फेरफार करुन त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे स्पष्ट केले आहे.