मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तेही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, असा चिमटा गिरीश बापट यांनी काढला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बापट आले होते. त्यावेळी त्यांनी हा चिमटा काढला. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे मी तुमच्या माध्यमातूनच ऐकत आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत जयंतराव आणि मुख्यमंत्र्यांनीच ठरवायचे आहे, असा चिमटा काढतानाच मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय, असं बापट म्हणाले.
केंद्र आणि राज्याचे काही कॉमन प्रश्न आहेत. त्यावर राज्य आणि केंद्र सरकारकडून काही निर्णय घेता येईल, याबाबत चर्चा झाली. रेल्वे सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. केंद्राने राज्याला अधिकाधिक निधी देण्याबाबतही चर्चा झाली. राज्यातील अपूर्ण प्रकल्पांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. राज्यातील रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही चर्चा करण्यात आल्याचं बापट म्हणाले. बैठक चांगली झाली. दर 2 ते 3 महिन्यांनी अशी बैठक घेतली तर प्रश्न सोडवणं सोपं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
आजच्या बैठकीत सीमा प्रश्नावरही चर्चा झाली. सीमाप्रश्नी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सीमा प्रश्नी सर्व खासदारांनी पंतप्रधानांना भेटण्याचा बैठकीतील सूर होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी सर्व खासदारांनी साथ द्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचं बापट यांनी सांगितलं. केंद्राकडून जीएसटीपोटी 25 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. राज्याला जीएसटीचा हा परतावा मिळावा, याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचंही ते म्हणाले.
Read Also
पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लस घेणार…
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ नाना पटोलेंच्या गळ्यात पडणार? मात्र पटोलेंची जागा कोण घेणार?