मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्याांवरची टिका होती आणि गेल्या पाच वर्षात ज्या चांगल्या गोष्टी मोदींच्या सरकारने केल्या आहेत त्याचं कौतुकही केलं आहे. काश्मीरमधून ३७० कलम हटवणं, अयोध्येत राम मंदिर उभारल्यावर त्याचं कौतुक पण मीच केलं होतं. धर्माच्या आधारावर आपल्याला राष्ट्र उभं नाही करायचं आहे, परंतु १९९२ पासून २०२४ पर्यंत राम मंदिर रखडलं होतं, जे २०२४ ला उभं राहिलं ह्याचा निश्चित मला आनंद आहे. असे राज ठाकरे यांनी सांगितले. आज राज ठाकरे यानी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, १९९२ च्या आंदोलनाच्या वेळेला टीव्हीवर कारसेवकांना घातलेल्या गोळ्या, कारसेवकांची शरयू नदीत वाहणारी प्रेतं ही दृश्य लोकांनी पाहिली होती. ती दृश्य खूप चीड आणणारी होती. या राम मंदिरासाठी कार सेवकांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. त्यामुळे इतक्या त्यागानंतर मंदिर उभं राहिलं त्याच्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की जरी राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी जर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते हे राम मंदिर उभंच राहिलं नसतं. असेही राज ठाकरेंनी सांगितले.
एनआरसीचा विषय असेल, ३७० कलमाचा विषय असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते, तर हे विषय प्रलंबितच राहिले असते. त्यामुळे मी अनेक वेळा मोदींना फोन करून त्यांचं चांगल्या कामांसाठी व्यक्तिशः अभिनंदन देखील केलं आहे. त्यामुळे अजून काही चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर एका बाजूला कडबोळं नेतृत्व आणि दुसरीकडे एक सक्षम नेतृत्व असा पर्याय असताना नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाला अजून एक संधी मिळायला हवी असं मला वाटलं आणि त्यातून नरेंद्र मोदींना पाठींबा द्यायचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रासाठी आमच्या नरेंद्र मोदींकडे काही मागण्या आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचं संवर्धन करणं आणि तसंच मी सभेत म्हणलं तसं की तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सर्व राज्यांना एकसमान वागणूक मिळायला हवी. भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आमच्या पक्षातील कोणाशी प्रचारासंबंधी संपर्क करायचा आहे याची यादी लवकरच पक्षाकडून संबंधितांना कळवली जाईल, त्यांनी त्यांच्याशीच संपर्क करावा. आणि माझ्या सहकाऱ्यांना, या उमेदवारांनी मानानेच वागवलं पाहिजे. प्रचारासाठी सभा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या ह्याचा निर्णय चर्चेअंती घेतला जाईल. असेही त्यांनी स्पष्ट केलं.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकारण करणारे राजकारण करत राहतील परंतु आम्ही..” सुनील तटकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्यदयात भाजप तर हातात धनुष्यबाण”, मल्हार पाटलांचं मोठं विधान
हेही वाचा…ठरलं तर मग…! राम सातपुते की प्रणिती शिंदे लढतीत ‘या’ समाजाची मतं गेम चेंजर ठरणार