यंदाच्या वर्षी सुरुवाती पासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे . पाऊस दमदार झाल्याने खरीपाची पिके जोमात आहेत. त्यातच अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरीना युरियाची साथ देण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रासमोर युरियासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले आहे.
यंदा पेरा वाढल्याने खतांच्या मागणीही वाढली आहे. मागील खरीपात जूनच्या पहिल्या आठवड्यात फक्त ७.५ लाख हेक्टर पेरा झाला होता. मात्र, यंदा याच कालावधीत १ कोटी ७.५ लाख हेक्टरवर पेरणी झाल्याचे समोर आले आहे . देशात एकूण रासायनिक खतांच्या वापरात एकट्या युरियाचा वापर ५९ टक्के आहे. हे खत तुलनेत स्वस्त असल्याने तसेच वापराचे परिणाम पिकांवर लवकर दिसत असल्याने शेतकऱ्यांची पसंती युरियाला असते. युरिया या नत्रखतांचे नाव माहित नसलेला शेतकरी शोधूनही सापडणार नाही. युरीयामुळे अल्पावधीमध्येच पिकांची होणारी जोमदार वाढ, हिरवागार तजेलदारपणा आणि उत्पादनात होणारी भरघोस वाढ शेतकरी दृष्टीआड करू शकत नाही.
जाणून घ्या नत्र खताचे फायदे :
- पिठांना नत्राची मात्रा तत्काळ लागू पडते.
- पिकाची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो.
- इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते.
- बाजारात युरिया सहजपणे उपलब्ध असतो.
- ड्रीपच्या माध्यमातून देता येते.
- काही प्रमाणात फवारणीद्वारे देता येतात.
- पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतात.