इंदापूर: उजनी धरणातील पाण्यावरून सध्या सोलापूर जिल्हा आणि इंदापूर तालुक्यात मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. इंदापूरचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली राजकीय शक्ती वापरून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांनी एकत्र येऊन मोठा विरोध केल्याने हा निर्णय सरकारला रद्द करावा लागला.
इंदापूरला जाणारे पाणी रद्द केल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी, सामाजिक संघटना आणि राजकीय नेते यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर तालुक्यातील सर्वांनी एकत्र येत आता राजकारण बाजूला ठेऊन इंदापूरच्या पाण्यासाठी संघर्ष करावा. अन्यथा येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. इंदापूर तालुक्यातील विरोधकांनीही पाण्याच्या प्रश्नावर आपली भूमिका स्प्ष्ट करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि नीरा डावा कालवा सल्लागार समितीचे माजी सदस्य ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे यांनी केले आहे.
ॲड.शिंगाडे म्हणाले की, पुणे जिल्ह्याची लोकसंख्या वाढत गेल्याने शहराला ९ टीएमसीवरून २२ टीएमसीपर्यंत पाणी द्यावे लागत आहे. यात इंदापूर तालुक्याचे पाणी कमी झाले. मागील अनेक वर्षांत सणसर कटमधून पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या पाठपुराव्यामुळे उजनीत येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा ऐतिहासिक आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेतलेला असताना या विरोधात सोलापूरकर एकत्र आल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतलेला निर्णय रद्द केला. हा निर्णय घेताना त्यांनी इंदापूरक तालुक्याचा विचार न केल्याने मी त्यांचा निषेध करतो .आता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असताना तालुक्यातील विरोधक यावर काहीच बोलत नाही. या पाण्याला त्यांचा विरोध आहे की सपोर्ट हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान ही ॲड. शिंगाडे यांनी या वेळी दिले.