मुंबई : सध्या संपूर्ण देशभर करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थती हाताबाहेर गेली आहे. गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातही करोनाने हाहाकार उडविलेला असून, राज्यात काल दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ करोना रुग्ण सापडले आहेत, तर ५६ हजार ७८३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र या दरम्यान, काल राज्यात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान यावरून एकीकडे राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमधले नेते आणि विरोधक यांच्यात टीका आणि आरोप प्रत्यारोपांची चांगलीच जुगलबंदी चालू असून, दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी, करोनाच्या काळात ठाकरे सरकार हे निर्लज्ज राजकारण करत आहे, अशी टीका केली. याला प्रत्युत्तरादाखल काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, असे खडे बोल गोयल यांना सुनावले आहेत.
आज समाज माध्यमांशी बोलताना त्यांनी, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल महाराष्ट्राची वकिली करायची सोडून जावडेकरांप्रमाणे महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवत आहेत. महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवून केंद्र सरकार मेहरबानी करत आहे का, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.
तसेच पीयुष गोयल महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असे सांगतात. आम्ही ऑक्सिजनची मागणी कमी करावी, म्हणजे नक्की काय करावे, हे त्यांनी सांगावे. गोयल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत, या शब्दांत थोरातांनी पीयुष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
दरम्यान, करोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात, करोना बाधित रुग्णांसाठी बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर इंजेक्शन्स या आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, याची उपलब्धता वाढवण्याच्या प्रयत्नात आरोग्य सुविधांवर प्रचंड भर येत आहे. परिणामी राज्यात आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.