पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जे फुकट मिळालं आहे ते हजम करावं, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते. अण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारवरही निशाणा साधला. राज्यातील सरकारला नवीन काही सुरू करायचं नाही. मात्र, जे सुरू आहे ते बंद करण्यात हे सरकार पटाईत आहे, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली.
हाथरस प्रकरणी कंठ फुटला होता…
हाथरस प्रकरणी राज्य सरकारमधील मंत्र्यांना कंठ फूटला होता. मग आता पारोळा (जि.जळगाव) येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची विष पाजून नराधमांनी हत्या केली. आता सत्ताधारी गप्प का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
संजय राऊतांनाही फटकारलं..
नितीशकुमार यांनी बिहारमध्ये महाराष्ट्रातील पॅटर्न राबवावा, असा सल्ला देणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही चंद्रकांत पाटील यांना चांगलंच फटकारलं. सल्ला द्यायला संजय राऊत यांना आता दिल्लीत पाठवायला हवं. खरं तर अमेरिकेतही त्यांची गरज होती, अशा शब्दांत चंद्रकांतदादा यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
दरम्यान, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जयंत पाटील यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना राज्यातील भाजप नेत्यांकडून सरकारच्या स्थिरतेबद्दल नेहमी वक्तव्ये केली जातात. पण आमचं सरकार 5 वर्षे टिकणार, तुम्ही स्वप्नच बघत बसा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता.
Read Also :
मंदिरं उघडण्यासाठी भावना भडकावून उद्रेक करण्याचा प्रयत्न चुकीचा, वारकरी साहित्य परिषदेची भूमिका
‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे साखर कारखान्यासमोर आंदोलन
नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची टीका
भाजपाविषयी मला अहंकार नाही तर प्रेम कारण भाजपा हा माझ्या बापाचा पक्ष: पंकजा मुंडे
…खरा खेळ तर आता सुरू झाला आहे, अर्नब गोस्वामीचे ठाकरेंना आव्हान