मुंबई : भारतात महामारीची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे देशाला जगभरातून मदत घ्यावी लागत असून, आत्तापर्यंत देशाला जगभरातील ४० देशांनी वेगवेगळ्या आरोग्य आणि इतर साहित्यांची मदत केली आहे.
दरम्यान, बाहेरच्या देशांकडून केंद्र सरकारला मिळणारी मदत, केवळ भाजपशासित राज्यांना मिळत असून, महाराष्ट्राशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे #PMCares प्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारे ही आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 7, 2021
सचिन सावंत यांनी एका गुजराती वृत्तपत्रातील आलेल्या माहितीच्या दाखला देत, मोदी सरकारवर हा गंभीर आरोप केला असून, त्यांनी ट्विट करत, “४० देशांच्या आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले. वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र या यादीत नाही. भाजप शासित युपी, बिहार, एमपी, हरियाणा, गुजरात इ. राज्ये त्या यादीत आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं. मोदी सरकारचा जाहीर निषेध.” अशा शब्दांत केंद्रावर हल्लाबोल केला आहे.
यावेळी त्यांनी, “सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे #PMCares प्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे, तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारे ही आहे.” असं देखील म्हटलं आहे.